Friday, June 13, 2014

गायतोंडे यांची बहिण म्हणते…





गायतोंडे ग्रंथात त्यांच्या भगिनी किशोरी दास यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. सुमारे नऊ ते दहाहजार शब्दांच्या लेखात त्यांनी गायतोंडे यांच्या विषयीच्या सर्वच आठवणी अतिशय भावूक होऊन लिहिल्या आहेत. आईचे निधन झाल्यावर अंत्यदर्शनाला देखील फिरकलेले गायतोंडे त्यातून जेव्हा दिसतात तेव्हा साहजिकच आपल्याला धक्का बसतो, अशा अनेक धक्कादायक गोष्टी या प्रदीर्घ लेखात किशोरी दास यांनी सांगितल्या आहेत. याच लेखातला हा अतिशय भिडणारा भाग खास तुमच्यासाठी 


"मग कधी वाटतंएकुलत्या एका भावाविषयीचं माझं दुःख, माझ्या तक्रारी निदान मी बोलून तरी दाखवू शकते. पण बाळचं काय ? शेवटपर्यंत तो अव्यक्तच राहिला. आपल्या कळणाऱ्या चित्रांतूनच परस्पर संवाद साधत राहिला. आयुष्यभर त्यानं कधी देवाला हात जोडला नाही, पण सगळे पाश तोडा, मायेत गुंतू नका, असं देवाचं वचन मात्र त्यानं तंतोतंत पाळलं. अर्थात हे करतांना त्याला सुखच झालं असेल असं नाही. रडताना त्याला मी कधी पाहिलं नाही. पण वडिलांसोबतच्या भांडणानंतरची एखादी तरी मध्यरात्र त्याच्या आसवांनी नक्कीच भिजली असेल, हे खात्रीनं सांगेन. त्याच्या अबोलपणामुळे दरवेळेस त्याच्या भोवती नव-नवी मिथकं गुंफली गेली. पण या मिथकांच्या चक्रव्यूहातून दरवेळेस तो चित्रकलेवरच लक्ष्य साधत आला. 



अर्थातच हे सोपं नव्हतं. मुळातच त्या चाळीतून भरारी घेऊन इथपर्यंत पोहोचणं हेच किती मुश्किल ! त्या चार भितींच्या कोंदणात तो फुललाही नसता. घरच्या जबाबदाऱ्यांत अडकला असता तर बाळ आजचा गायतोंडेही झाला नसता. पण तरीही त्या चार भिंतींनी त्याला काही तरी नक्कीच दिलं असेल. तिथल्या पोपडे उडालेल्या भिंतींत एखादा फॉर्म त्याला गवसला असेल. माळ्यावरच्या अंधारानं नजर रोवण्याचा निग्रह दिला असेल. तिथल्या गेलरीच्या कठड्यातून रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या आकाशानं स्वतःशीच संवाद साधण्याचं कौशल्य दिलं असेल; आणि तिथल्या जमिनीनं एकाग्रतेनं बसकण मारण्याची शक्तीत्याच्या दडपलेल्या इच्छा-आकांक्षांच्या, हरवलेल्या, करपून गेलेल्या एकाकी बालपणाच्या कित्येक जाचक हकिगती तिथल्या दगड-विटांच्या कोनाकोनात झिरपल्या असतील आणि त्यांनीच दिला असेल त्याला मूलमंत्र जगाशी फटकून राहण्याचा. मध्यंतरी त्या प्रेमामुळे कोवळिकतेचा पाझर त्याला फुटलेलाही. पण नियतीला तेही मंजूर नसावं; कारण तिला घडवायचा होता आजचा गायतोंडे. लाव्हा आतल्या आत खूप उकळावा आणि बाहेर पडल्यावर त्यानं थैमान घालावं, तसंच बाळच्या बाबतीत त्या खोलीतून बाहेर पडल्यावर झालं आणि त्या खोलीतून बाहेर पडून त्यानं त्याच्यापुरतं तरी जग जिंकलं. मग वाटू लागतं, ही खोली फक्त त्याचीच होती की काय ? जिनं फक्त त्यालाच घडवला. होय, घडवलाखऱ्या अर्थानं. आम्हाला फक्त मोठं केलंवयानं !!" 


तब्बल १०००० शब्दांचं हे अस्वस्थ करून टाकणारं आत्मकथन " गायतोंडे " ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरावं. आपण अजूनही हा ग्रंथ बुक केला नसेल तर ९००४० ३४९०३ या नंबरावर तुमचं नाव, पत्ता आणि इमेल एसेमेस करा आणि २० जून नंतर ३००० रुपयांचा हा ग्रंथ फक्त रु १६५० इतक्या घसघशीत सवलतीत घरपोच मिळवा. आता वेळ दवडू नका …..

No comments:

Post a Comment