Thursday, June 18, 2015


"गायतोंडे" : Recap 1
'प्रत्यक्षात असा असेल ग्रंथ…'

सर्वात आधी या तयार झालेल्या ग्रंथाविषयी सांगतो, कारण त्याविषयी सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ही जी उत्सुकता निर्माण झाली आहे, तीत फेसबुकचा वाटा मोठा प्रचंड आहे. म्हणूनच गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाचं प्रकाशन होण्यापूर्वी जे काही लिहायचं ते फेसबुकवरच असं मनाशी निश्चित केलं होतं. इथून पुढं ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत गेल्या तीन चार वर्षातल्या साऱ्याच महत्वाच्या पोस्टचा धांडोळा तर आपण घेणारच आहोत पण मधल्या काळात मिळालेली खूप नवी माहितीदेखील शेअर करणार आहोत.
गायतोंडे यांच्या सहीचा वापर करून खास डिझाईन केलेल्या कोरोगेटेड बॉक्समधूनच हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा ग्रंथ पुस्तक विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याने आणि स्पीड पोस्ट किंवा कुरियर मार्फतच पाठवला जाणार असल्याने तो वाचकांच्या हाती अत्यंत सुरक्षितपणे पडावा यासाठी विशेष जाडीचा कोरोगेटेड पेपर निवडण्यात आला आहे. हेतू हा की पोस्टाच्या किंवा कुरियरच्या हजार एक किलोमीटरच्या प्रवासातदेखील त्याला ओरखडा देखील न पडता तो वाचकांच्या हातात अत्यंत सुरक्षितपणे पडावा. हा निर्णय ग्रंथाचा आकार आणि वजन पाहूनच घेण्यात आला आहे. कारण गायतोंडे मूळ ग्रंथ आणि त्यासोबत दिली जाणारी गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीची कथा सांगणारी २८ पानी पुस्तिका यांचे वजन तब्बल २ किलो भरले हेच होय. छपाईच्या पाश्चात्य जगात लोकप्रिय असलेला "इमोटे +" नामक जो कोरियन कागद या ग्रंथाला आम्ही वापरला आहे त्याच वजनचं मुळी १३० gsm आहे. आसपासचा कागददेखील १६० gsmचा वापरलाय. केस बाईंडिंगसाठी वापरलेला बोर्डदेखील विशेष जाडीचा आणि बनावटीचा वापरला आहे. जेणेकरून ग्रंथ कसाही आणि कोठेही ठेवला तरी तो उभा राहावा. मूळ ग्रंथ आणि पुस्तिका पावसातदेखील वाचकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहचावी यासाठी खास Shrink Wrapping पद्धत वापरण्यात आली आहे. डिझायनर बॉक्समध्येही तो आतल्या आत हलून त्याचे कोपरे दुमडले जाऊ नयेत म्हणून बबल्स पेपर्सचा देखील वापर करण्यात येणार आहे.

डिझाईनप्रमाणेच कागद, छपाई, बांधणी, मांडणी इत्यादी ग्रंथाशी संबंधित साऱ्याच विभागात आम्ही काहीच करायचे शिल्लक ठेवलेले नाही. गायतोंडे यांच्या चरित्राचा समग्र आढावा घेणारा एकही ग्रंथ अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. तो मराठी भाषेतच पहिल्या प्रथम प्रसिद्ध होत आहे. म्हणूनच जो प्रसिद्ध होणार आहे तो ग्रंथ चित्रकलाविषयक जागतिक दर्जाच्याच ग्रंथांच्या तोडीचा व्हावा असे जे स्वप्न सुरुवातीपासून पहिले होते ते आता इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर का होईना पूर्ण होतांना दिसते आहे याचा आनंद विशेष आहे.

'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.chinha.co.in/promo/Webdesign.pdf
'गायतोंडे' ग्रंथाच्या निर्मितीची कथा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.chinha.co.in/p…/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf

आणि रु. ३००० चा 'गायतोंडे' ग्रंथ रु. २००० मध्ये मिळवण्यासाठी 90040 34903 इथे YES GAI एवढाच मेसेज पाठवा.


गायतोंडे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकताना केलेलं क्लासवर्क. या चित्रांमागेदेखील एक अफलातून कहाणी दडलीय. पोलिसातच नाहीतर कोर्टातदेखील केस गेली आहे, पण तिच्याविषयी पुढे कधीतरी.

Wednesday, June 17, 2015


"गायतोंडे" : Recap




२०१२ सालच्या जानेवारी महिन्यात 'चिन्ह'चं गायतोंडे पेज सुरु झालं. त्याच्या दोन-तीन महिनेच आधी आम्ही 'गायतोंडे' ग्रंथाच्या प्रकाशनाची घोषणा केली होती. आता हे २०१५ साल तब्बल चार वर्ष लोटली या ग्रंथाच्या निर्मितीत. निर्मितीचा हा सगळाच अनुभव मोठा विलक्षण होता. अनेक ताण-तणाव, उतार-चढाव या काळात अनुभवायला आले. पण हा साराच कालखंड मोठा रोमांचकदेखील होता. गेल्या चार वर्षात या पेजवरून आलेले सारेच अनुभव 'चिन्ह'च्या वाचकांशी आणि 'गायतोंडे' यांच्या चाहत्यांशी वेळोवेळी शेअर केले. ते शेअर केल्यानंतरदेखील बरेच काही घडले, घडतेदेखील आहे. आता हा ग्रंथ प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यावर आलेला असतांना शेअर केलेले सारेच अनुभव पुन्हा नव्याने लिहून पुन्हा शेअर करावे असे मनापासून वाटले. पण ते करीत असतांना आधीचे काहीच वाचायचे नाही असे पथ्य पाळले जाणार आहे. त्यातून कदाचित चांगले काहीतरी वाचावयास जरूर मिळेल असे मनापासून वाटते. लिहिलेले सारेच ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत याच पानांवरून शेअर केले जाणार आहेत. कसे वाटले ते जरूर कळवा. तोपर्यंत 'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमोदेखीलhttp://www.chinha.co.in/marathi/index.html या लिंकवर पाहू शकता.

Tuesday, May 26, 2015

न संपणाऱ्या शोधाची कहाणी… 
गायतोंडे’ चित्रांचाही काळाबाजार...


दुसरा किस्सा आहे तो मूळ चित्र ‘फेक’ ठरवलं जाण्याचा. जेजे— मधली आमच्या किती तरी नंतरच्या बॅचला असलेली एक मुलगी लग्नानंतर दिल्लीला गेली. मुंबईत असताना ती एका मोठ्या गॅलरीत काही काळ नोकरी करत होती, साहजिकच चित्रांचे सारे व्यवहार तिला ठाऊक. मूळची ती श्रीमंत. लग्नही अशाच घरी झालेलं. दिल्लीत गेल्यावर तिला कधी तरी गायतोंडे यांच्या स्टुडिओत जायची संधी मिळाली. स्टुडिओत असलेलं एक पेंटिंग तिला आवडलं, म्हणून तिनं गायतोंडे यांना ते मला विकत देता का विचारलं, तर त्यांनी सरळ नकार दिला. म्हणाले, ‘माझं सर्वात आवडतं पेंटिंग आहे ते, मी मरताना मला ते समोर हवं आहे मला नाही विकायचं ते,‘ वगैरे. पण मग नंतर तिनं ते त्यांच्याकडून मिळवलंच.
त्याला आता 17-18 वर्षं झाली. अलीकडे गायतोंडे यांच्या चित्रांचे भाव गगनाला भिडू लागले, तेव्हा कुणी तरी लिलाव कंपनीचा माणूस तिच्याकडे आला आणि आणि तिच्या पश्चात तिच्या नवर्‍याकडून लिलावात चित्र टाकतो म्हणून चित्र घेऊन गेला. हिनं खूप आकांडतांडव केलं, पण उपयोग झाला नाही. मग एके दिवशी हिला कळलं की लिलाव कंपनीनं ते चित्र मूळ आहे का ते पाहण्यासाठी ज्या व्यक्तीला दाखवलं तिनं ते चित्र फेकअसल्याचं लिहून दिलंय. हिनं ते ऐकलं आणि भडकलीच. ज्या व्यक्तीनं ते लिहून दिलं होतं तिला जाऊन तो सारा पत्रव्यवहार दाखवला, फोटो दाखवले आणि पैसे कसे दिले ते सांगू म्हणून विचारलं, तेव्हा ते चित्र फेकआहे सांगणार्‍या व्यक्तीनं तिची माफी मागितली.

ती सांगत होती की या क्षेत्रातही आता माफिया उतरले आहेत - आर्ट माफिया. ते ठरवतात की कुठलं चित्र कुठ कसं उचलायचं, कधी त्याची किंमत वाढवत न्यायची वगैरे. लिलावात त्यांच्याशिवाय तुम्ही चित्र टाकूच शकत नाही, आणि टाकलंच समजा तर त्याला फार बोली लावली जाणार नाही ना याची सारी काळजी ते घेतात. त्यासाठी कुठल्याही टोकाला जायची त्यांची तयारी असते. गायतोंडे यांची सार्‍या आयुष्यभराची कलानिर्मिती इतर चित्रकारांच्या निर्मितीच्या मानानं तुलनेनं कमी असल्यानं, या लोकांमध्ये गायतोंडे यांना प्रचंड मागणी आहे. ती जे काही सांगत होती ते ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला. कुठं आयुष्यभर कलानिर्मितीचा ध्यास घेऊन जगलेलं तडजोडविरहित लोकविलक्षण आयुष्य, तर कुठं हे पै-पैशासाठी हपापलेलं आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी असलेलं लाजिरवाणं जिणं. या सार्‍याची सांगडच मुळी कशी घालायची हेच कधी कधी कळेनासं होतं.

तिसरा किस्सा आहे तो फेकचित्रं कशी होतात त्याचा. मुंबईच्या कलावर्तुळात विख्यात (खरं तर कुख्यात असाच शब्द इथं योग्य आहे) असलेल्या एका अतिविशाल महिलेनं आपल्या संग्रहातलं एक चित्र विकायला काढलं. ते गायतोंडे यांचं आहे असा तिचा दावा होता. माझ्या पत्नीला तिनं ते दाखवलं. तिनं मी गायतोंडे यांची चित्रं जमवत असल्यानं त्या चित्राचा फोटो काढला आणि मला दाखवला. मी ते चित्र पाहून अवाक झालो. हे असलं काम गायतोंडे यांनी कुठल्या काळात केलं असेल याचा विचार करकरून माझी मती गुंग झाली. बरं, त्या चित्राचा आकार गायतोंडे यांच्या अन्य चित्रांच्या आकारांना सूट व्हावा तर तेही नाही. रंग लावण्याची पद्धत तर अत्यंत तिसर्‍या दर्जाची. आणि मुख्य म्हणजे हे असले चित्रविषय घेऊन आयुष्यात कधी गायतोंडे यांनी अशी चित्रं रंगवली असतील यावर माझा विश्वासच बसेना. त्यावर गायतोंडे यांची सहीदेखील नव्हती. ना मागे, ना पुढे. म्हटलं, कशावरून हे गायतोंडे यांचं चित्र ? तर त्यावर त्या बाईचं म्हणणं असं होतं की ती सही जो आकार चित्रात रंगवला होता त्यातच होती, आणि तिनं ती माझ्या पत्नीला त्यातून काढून दाखवली. पण तिला जी सही त्या चित्रात दिसत होती ती काही माझ्या पत्नीला प्रयत्न करकरूनदेखील दिसत नव्हती. मी माझ्या पत्नीला तो फोटोदेखील फाडून टाकायला सांगितला आणि विषय बंद करून टाकला.

काही दिवसांनी एक ज्येष्ठ चित्रकार स्नेही भेटले. बोलता बोलता गायतोंडे यांच्या चित्रांचा कसा काळाबाजार चालला आहे म्हणून सांगू लागले. काय झालं म्हणून विचारलं, तर असं असं एक चित्र आपल्याकडे ते गायतोंडे यांचं आहे का म्हणून विचारायला कुणी तरी आलं होतं म्हणून सांगू लागले. ते जे चित्र सांगत होते ते तेच चित्र असावं याची माझी खात्री पटली. म्हणून मग पण मी त्यावर गायतोंडे यांची सही कुठं होती असं विचारलं, तर त्यांनी चित्रात जो आकार रेखाटला होता त्याचं वर्णन करून ती सही नेमकी कुठल्या अवयवावर होती त्याचं वर्णन केलं. तर ते तेच चित्र निघालं. त्यांनी ते चित्र गायतोंडे यांचं नाही म्हणून ठामपणे सांगितलं आणि परत पाठवलं. पण म्हणाले, ती गोष्ट तिथं संपली नाही.

काही दिवसांनी मुंबईच्या कलावर्तुळात प्रसिद्ध असलेली आणखी एक अतिविशाल महिला त्यांच्याकडे तणतणत आली आणि म्हणाली, ‘तुम्हाला गायतोंडे यांची चित्रं सर्टिफाय करायचा अधिकार कोणी दिला? पुन्हा जर असं काही केलं तर तुम्हाला तुरुंगात टाकेन. तुरुंगात खितपत बसावं लागेल, लक्षात ठेवा. ते चित्र मी सर्टिफाय केलंय. मला ते करण्याचा अधिकार आहे,’ इत्यादी आरडाओरडा करून, प्रचंड शिव्याशाप घालून ती महिला निघून गेली. या गृहस्थांच्या पत्नीला त्या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. तिनं ते सारं दुसर्‍या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी मुंबईच्या पोलिस कमिशनरांच्या पत्नीच्या कानांवर घातलं. नंतर नक्की काय झालं कुणास ठाऊक. ती अतिविशाल महिला त्यांच्याकडे रडत रडत आली आणि माफी मागून निघून गेली. पण त्या दोन्ही अतिविशाल महिलांचा उच्च वर्तुळात असलेला एकूण वावर पाहता ते चित्र नंतर विकलं गेलं नसेल यावर मी तरी कधीच विश्वास ठेवणार नाही.

मी निरीश्वरवादी आहे, मी नशीब वगैरेदेखील मानत नाही, पण आयुष्यात आपण जी काही वाईट कृत्यं करतो त्याची फळं मात्र आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात यावर मात्र माझी श्रद्धा आहे. त्या अतिविशाल महिलांना पुढं प्रचंड कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. भयंकर आरिष्टांना सामोरं जावं लागलं. आता मुंबई सोडून दूर गेल्याला मला जवळ जवळ चार एक वर्षं झाली आहेत. मुंबईच्या कलावर्तुळाशी असलेला माझा संपर्क 1998 नंतर मी क्रमशः कमी कमी करून आता तर पूर्णतः संपवून टाकला आहे. त्या महिला अद्याप हयात आहेत किंवा नाहीत हेही मला आता ठाऊक नाही, ज्या गावाला आपल्याला जायचं नाही तिथला पत्ता तरी कशाला विचारायचा, म्हणून मीही त्याविषयी कधी चौकशीदेखील केलेली नाही. कधी तरी हे लिहिणं गरजेचं होतं, सतत मनात खदखदत होतं म्हणून मी ते इतकी वर्षं साठवून डोक्यात ठेवलं होतं. हे लिहिल्यानंतर आता मी त्यातून मोकळा झालोय, सारं काही विसरूनदेखील गेलोय. इत:पर याविषयी मी आता जास्त काहीही बोलू इच्छित नाही, आणि कुणी ते मला विचारूही नये.

++++++++

वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे.त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.

Tuesday, May 5, 2015


न संपणाऱ्या शोधाची कहाणी 
'गायतोंडे' : फेक चित्रांच्या कहाण्या...
‘गायतोंडे‘ ग्रंथाची घोषणा कर्णोपकर्णी होताच सर्वात जास्त त्रास दिला असेल तर तो गायतोंडे यांच्या तथाकथित संग्राहकांनी. वेळीअवेळी येणार्‍या त्यांच्या दूरध्वनांनी काही काळ मी त्रस्तच झालो होतो. सार्‍यांचं म्हणणं काय तर ’आम्हाला तुम्हाला भेटायचंय.’ ते ऐकून ‘अरे, आपण एवढे लोकप्रिय झालो की काय?‘ असं काही तरी वाटून उगीचच मला विचित्र वगैरे वाटू लागलं होतं. ‘का भेटायचंय?‘ विचारलं तर सांगायचे, ‘गायतोंडे यांची काही चित्रं आमच्या संग्रहात आहेत ती तुम्हाला दाखवायची आहेत.’ पण ‘मलाच का दाखवायची आहेत?’ विचारलं तर ‘पुस्तकात छापायची आहेत‘ हे एवढं एक खरं खरं उत्तर सोडून जी काही नानाविध गमतीदार उत्तरं यायची ती प्रचंड मनोरंजक असायची. पण मग त्यांना उगीचच मी भिवंडीजवळ राहतो, तुम्हाला ते खूप लांब पडेल, वगैरे सांगून घाबरवायचो. खरं तर मी राहतो त्या ठिकाणाहून भिवंडी 11 किलोमीटर दूर आहे, पण ही मात्रा चांगलीच लागू पडायची. तरी काही जण मात्र तिथपर्यंत पोहोचायचेदेखील.

असेच एक गृहस्थ भिवंडी वगैरेला भीक न घालता पुढं आले. त्यांना अधिक पुढं न येऊ देणं आवश्यक होतं, म्हणून मग मीच पुढं सरसावलो. ‘किती चित्रं आहेत तुमच्यापाशी गायतोंडे यांची?’ तर म्हणाले, ‘मोजली नाहीत... खूप आहेत. ऑईल, ड्रॉइंग, स्केचेस, ग्राफिक्स, सारं काही आहे आपल्याकडे. आणि हो, तुमच्या त्या बॉम्बे स्कूलचे खूप आर्टिस्ट आहेत आपल्याकडे.‘ ‘पण मलाच का दाखवायची आहेत तुम्हाला ती चित्रं?’ तर म्हणाले, ‘तुमचं खूप नाव ऐकलं आहे, तुमचं कामदेखील खूप मोठं आहे. आणि आता तुम्ही गायतोंडे यांच्यावर पुस्तकदेखील काढताय असं वर्तमानपत्रात वाचलं, म्हणून तुम्हाला सारी चित्रं दाखवावीशी वाटली. त्यासाठीच मी तुमच्याकडे येऊ इच्छितो.‘ आता इतकं ऐकून घेतल्यावर मला गुगली टाकणं भाग होतं, आणि मी तो टाकला. ‘अहो, एवढी मोठी चित्रं तुम्ही कशी आणाल? शिवाय टोल नाका, जकात या भानगडीत फार वेळ वाया जाईल हो तुमचा.’ तर म्हणाले, ‘फार मोठी नाहीत हो चित्रं, गाडीत सहज मावतील, काळजी करू नका, मी मॅनेज करतो सारं.’ त्यांच्या तोंडून हे ऐकलं आणि माझी खात्री झाली, की नक्कीच ही सारी चित्रं ‘फेक’च असणार.

आणि तसंच झालं. पाहता क्षणीच ती चित्रं ‘फेक’च आहेत हे माझ्या लक्षात आलं. ते गृहस्थ मात्र त्या चित्रांचं गुणगान गाण्यातच मग्न होते. गायतोंडे यांच्या प्रत्येक चित्रामधून सतत भावत राहणार्‍याझिरपत राहणार्‍या एका विलक्षण निर्लेप शांततेचा त्या चित्रांत कुठं मागमूसदेखील नव्हता. तिसर्‍या दर्जाच्या कला शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या चौथ्या किंवा पाचव्या दर्जाच्या चित्रकारानं केलेलं ते काम होतं. ती चित्रं गायतोंडे यांची आहेत असं सांगणं हा गायतोंडे यांचा ढळढळीत अपमान होता. गायतोंडे यांनी चित्रासाठी किंवा चित्रकार होण्यासाठी काय त्याग केलाकाय काय सोसलंकाय काय भोगलंहे जरादेखील ठाऊक नसलेल्याकिंबहुना त्याची पुसटशीदेखील कल्पना नसलेल्या अत्यंत निरक्षर आणि निर्बुद्धांनी (त्यांना दोन पाय आहेत म्हणून माणसं म्हणायचंनाही तर ती जनावरंच.) केलेला चित्रं काढण्याचाविकण्याचा आणि विकत घेण्याचा शुद्ध बेशरम व्यवहार म्हणजे ती चित्रं होतीएवढंच फार तर त्यांविषयी म्हणता येईल. मला जे म्हणायचं आहे ते शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत मांडायचा मी प्रयत्न करतोययाची कृपया दखल घ्यावी. 

समोर आणा,
चाळीसच्या दशकातले जेजेत प्रवेश घ्यायला विरोध करणारेशिक्षणाला कपर्दिकही न देणारे आणि कुडाळदेशकर वाडीतल्या जिन्याच्या खांबाला बांधून पोराला पट्ट्यानं बडव बडव बडवणारे जमदग्नी वडील.
समोर आणा,
पन्नासाच्या दशकात समोर दिसणार्‍या मॉडेलचंच सारखं चित्र काढावं लागेल म्हणून जेजे स्कूलमधली सरकारी नोकरी नाकारणार्‍या तरुण गायतोंडे यांचा आत्मविश्वास.

समोर आणा,
वयाच्या चाळिसाव्या वर्षी घरादाराचे पाश तोडून मुंबई सोडून दिल्लीसारख्या परमुलखात जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेणारे गायतोंडे.

समोर आणा,
आधी प्रेमाच्या आणाभाका घेऊन विवाहाला तयार झालेली आणि नंतर रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून गायतोंडे अमेरिकेत जाताच दुसर्‍याशी विवाह करून मोकळी झालेली प्रेयसी.

समोर आणा,
दिल्लीत राहूनदेखील उदरनिर्वाहासाठी कुठलीही व्यावसायिक कामं न करता अखेरपर्यंत आपल्या पेंटिंगशीच एकनिष्ठ राहिलेले गायतोंडे.
समोर आणा
कॅनव्हास-रंगाला पैसे नसताना कागद आणि शाई खरेदी करून त्यावर नंतर अजरामर झालेली शेकडो कॅलीग्राफिक
ड्रॉइंग्ज रेखाटणारे गायतोंडे. 
समोर आणा,
साठीच्या उंबरठयावर असताना जीवघेण्या अपघातात सापडून कायमच्या शारीरिक व्यंगांचा सामना करत तब्बल आठ-नऊ वर्षं कोर्‍या कॅनव्हाससमोरच्या खुर्चीत बसून पेंटिंग सुरू होण्याची वाट पाहत बसणारे गायतोंडे.


हे सारं सारं समोर आणाम्हणजे मग आजवर ‘चिन्ह’नं का पोटतिडकीनं हे सगळं समोर आणलंमांडलंते समजून घेता येईलआणि सारं आयुष्य केवळ चित्र आणि चित्रकलेसाठी संन्यस्त वृत्तीनं जगलेल्या अशा चित्रकाराच्या चित्रांची आपण केवळ आपल्या पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठी ‘फेक’ चित्रं तयार करून केवढं मोठं गुन्हेगारी कृत्य करतो आहोत याची जाणीव होऊन किंचितशी तरी लाज वाटेलशरम वाटेल.



जे गृहस्थ गायतोंडे यांची तथाकथित चित्रं घेऊन माझ्यापाशी आले होते. त्यांना या सार्‍याची किंचितदेखील जाणीव नसावीआणि ती करून घेण्याची गरजदेखील त्यांना भासली नसावी. त्यांना फक्त स्वारस्य होतं ते ‘ही मी विकली तर मला याचे किती लाख किंवा कोटी जास्त मिळतील’ यातबस फक्त यात. आणि यातच. त्यांना मी गायतोंडे यांच्यावर किती काम केलं आहेकाय काम केलं आहेत्यासाठी किती काळ वेचलावगैरे गोष्टींत काही एक रस नव्हता. ‘चिन्ह’चे अंक नुसते वरवर पाहण्यातदेखील त्यांना स्वारस्य नव्हतं. त्यांना जमली तर ती सारीच्या सारी चित्रं या ग्रंथात छापून आणायची होती. त्यांच्या संग्रहात असलेली ती सारी चित्रं कशी आणि किती मौल्यवान आहेतआणि ती सारी कशी खरी खरी आहेतहे पटवून देण्यासाठी ते ज्या काही कहाण्या मला सांगत होतेत्या केवळ चित्तचक्षुचमत्कारिक होत्या यात शंकाच नाही.

या सार्‍या कहाण्या मी आधी कितीदा तरी वेगवेगळ्या चित्रकारांच्या संदर्भात ऐकल्या असल्यानं माझा त्यांवर विश्वास बसणं केवळ अशक्य होतं. पण त्या ऐकल्या मात्र आणि या चित्रांचं उगमस्थान कोठं असावं याची किंचितशी कल्पना मला आली... आणि ती नंतर खरीही ठरली. गायतोंडे यांना सतत पैशाची गरज असायची. मग ते आपल्या मित्रांना कशी भेट म्हणून पेंटिंग्ज द्यायचे आणि त्यांच्याकडून कसे पैसे घ्यायचेयाचे उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येऊ लागल्यावर मात्र माझा संयम सुटला. आणि त्यांना मी स्पष्टपणे सांगून टाकलं की ‘तुमच्या संग्रहातली ही सारीच्या सारी चित्रं तद्दन ‘फेक’ आहेतफालतू पोटार्थी चित्रकारांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नीच आणि नालायक दलालांनी काढवून घेतलेली ती सारी चित्रं आहेत. तुम्हाला कुणी तरी फसवलं आहे.’ तर त्यावर मग ते गृहस्थ मला जागतिक लिलाव कंपन्या आणि त्यांची माणसं या चित्रांसाठी कशी आपल्या पाठीशी लागली आहेत हे सांगू लागले. ही चित्रं विकणं आपल्या दृष्टीनं काहीच अवघड काम नाही असं ते मला भासवत होते. म्हणजे एवढं सांगितल्यावरदेखील ती ‘फेक’ चित्रं ज्यांनी कुणी त्यांच्या गळ्यात बांधली होतीत्यांना ती ते परत करणार नव्हतेतर आणखी कुणाच्या तरी गळ्यात ते ती घालणार होते. हे तर आणखीनच भयंकर होतं. यावर ‘जे कोणी ती घेत असतील त्यांना ती जरूर देऊन टाका आणि मोकळे व्हा,’ असा सल्ला (?) देऊन संभाषण आटोपतं घेण्यापलीकडे मला दुसरं काही करता येत नव्हतं. त्यावर पुन्हा ‘ग्रंथाला काही मदत लागली तर जरूर सांगाकाही प्रायोजक वगैरे आहेत आपल्याकडे,‘ हेही अर्थात ऐकून घ्यावं लागलं. गायतोंडे यांची (फेक) चित्रं विकत घेऊन झाली होती. आता ती सारी चित्रं कशी खरी आहेत हे सांगण्यासाठी वापर करावा म्हणून ती व्यक्ती चक्क मलाच विकत घेऊ पाहत होती. या प्रसंगानंतर मात्र मी कानाला खडा लावला.

++++++++
वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे.त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.

Wednesday, April 1, 2015

न संपणाऱ्या शोधाची कहाणी 
चित्रशोधाच्या कहाण्या...
या ग्रंथासाठी गायतोंडे यांची चित्रं जमवणं हे सर्वात आव्हानात्मक काम होतं. ती जमवताना आलेले अनुभव लिहायचे म्हटलं तर एक छोटं पुस्तकच तयार होऊ शकेल, इतके ते नक्कीच आहेत. ती जमवताना ‘नाकी नऊ येणं‘ म्हणजे काय ते साक्षात अनुभवायला मिळालं. गायतोंडे यांची चित्रं ज्यांच्या ज्यांच्या संग्रहात आहेत असं कळलं त्या संग्राहकांशी सर्वप्रथम मेलनं संपर्क साधला. पण त्या मेलला साधी पोच द्यायची तसदीदेखील कुणी घेतली नाही. हा ग्रंथ केवळ मराठीतच नाही तर इंग्रजीमधूनदेखील प्रसिद्ध होणार आहे याची कल्पना देऊनदेखील काहीच फरक पडला नाही. अनेक संग्रहालयांकडून आलेले अनुभव तर अत्यंत कडवट होते. एका मोठया संग्रहालयानं तर पहिल्या मेलला तब्बल चार महिन्यांनी उत्तर दिलं. यावरून हा प्रवास किती खडतर झाला असेल त्याची कल्पना येईल. बरं, मेलला उत्तर देत नाही म्हणून फोन करावा, तर फोनवर त्या व्यक्ती उपलब्धच होत नसत. असल्या तरी उडवाउडवीची उत्तरं मिळत असत.


ज्या इमेजेस हाती येत त्या ताडून पाहतानादेखील प्रचंड दमछाक होत असे. कधी कधी नुसत्या इमेजेसवरून ही चित्रं अस्सल की नक्कल ते ठरवणं कठीण जात असे. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागत असे. बरं, ते चित्र फेकअसेल तर ज्याच्या मालकीचं ते आहे, त्याला ते चित्र फेकआहे असं स्पष्ट न सांगता नकाराची नाना कारणं देताना अक्षरशः तारांबळ उडत असे. ज्याचं ते चित्र आहे तोही बिचारा (?) फसलेला असायचा आणि नकार दिल्यानंतर फोनवरच्या संभाषणात जी एक भयाण शांतता पसरत असे तिनं ते सारं नकोसं वाटायला लागत असे. 

या चित्रं मिळवण्याच्या मोहिमेच्या तर खूपच कहाण्या सांगता येतील; पण विस्तारभयास्तव त्यांतल्या तीनच नमुने म्हणून सांगतो. माझ्या परिचयातल्या एका कलासंग्राहक बाईंकडे गायतोंडे यांचं चित्र असल्याचं मला ठाऊक होतं. त्यांचा-माझा परिचय जवळ जवळ 1985-86 सालापासूनचा. बहुदा माझं एक चित्रही त्यांच्या संग्रहात असावं. एके दिवशी मी त्यांना थेट फोन लावला. असं असं पुस्तक काढतोय, तर तुमच्या संग्रहातलं चित्र मला हवंय. त्या म्हणाल्या, विचार करून सांगते. आठ दिवसांनी काय ठरलं म्हणून विचारायला फोन केला तर म्हणाल्या, ‘नाही रे जमणार. असं आहे,’ म्हणाल्या, ‘गायची चित्रं ही आमच्यासाठी एक ठेवा आहेत. ती मी खास माझ्या संग्रहासाठीच घेतली आहेत. पण तू जर ती छापलीस तर ती जगजाहीर होतील आणि मग सारेच माझ्या मागे लागतील, विकता का? कितीला देता? एवढे देतो, तेवढे देतो, लिलावात टाकतो, अरे एक ना दोन. सतत फोन येत राहतील, सतत भेटायला येतील, नको जीव करतील रे. घरातली सारी शांतताच ढळून जाईल. तेव्हा सॉरी, मी नाही देऊ शकत तुला त्याची इमेज छापायला.हे असं अगदी थेट स्पष्ट उत्तर आल्यावर काय बोलणार? त्या म्हणत होत्या त्यात तथ्य तर होतंच. शेवटी मोठया अनिच्छेनं त्यांचा नाद सोडला. अनिच्छेनं अशासाठी की ते चित्र गायतोंडे यांचं महत्त्वाचं चित्र मानलं जातं. ते या ग्रंथात प्रसिद्ध झालं असतं तर या ग्रंथाचं संदर्भमूल्य नक्कीच अधिक वाढलं असतं. पण मला त्यांचं म्हणणंही पटलं. गायतोंडेंच्या एकेका चित्रासाठी तथाकथित नवश्रीमंतांत सध्या जी काही चढाओढ चालली आहे, ती सारी मला ठाऊक आहे. म्हणून मी पुन्हा काही त्यांना त्याविषयी कधी विचारलं नाही. 

दुसरा किस्सादेखील असाच हातून सुटलेल्या चित्रांचा आणि एका अफलातून स्टोरीचा. एके दिवशी सामोअरमध्ये प्रफुल्ला डहाणूकरांनी एका परदेशी बाईंची ओळख करून दिली. म्हणाल्या, ‘ही अमकी तमकी. हिची स्टोरी ऐक. भयंकर आहे. पण हिच्याकडे गायची एक नाही दोन नाही सात-आठ पेंटिंग्ज आहेत. बोल तिच्याशी,’ असं म्हणून त्या नेहमीसारख्या धावपळीत निघून गेल्या. तब्बल दीड-दोन तास आम्ही बोलत होतो. त्यांची स्टोरी खरोखरच भयंकर होती. पण ती काय होती हे मात्र मी आता सांगणार नाहीये, जर त्यांची माझी पुन्हा गाठ पडलीच तर ती मी चिन्हमधून नक्कीच सांगेन. 

ऐंशीच्या घरातल्या त्या बाई काही वर्षांपर्यंत भारतातच राहत होत्या. केवळ गायतोंडे यांनाच नाही तर सार्‍याच प्रोग्रेसिव्हच्या चित्रकारांना त्या चांगल्याच ओळखत होत्या. त्यांचा नवरा हा पहिला भारतीय कलासंग्राहक समजला जातो. सांगत होत्या, ‘इथून जवळच माझं घर होतं, त्यामुळे प्रोग्रेसिव्हच्या सार्‍या बैठका माझ्याच घरी होत असत. सार्‍याच चित्रकारांना माझं घर केव्हाही खुलं होतं.सांगता सांगता त्या इतक्या जुन्या आठवणांत शिरल्या की चित्रसंग्रहाच्या बाबतीत आपण एका मोठया माणसाकडून कसे फसवले गेलो हे सांगताना त्या भावनाविवश झाल्या आणि ओक्साबोक्शी रडू लागल्या. भरगच्च भरलेलं सामोअर आणि ऐंशी वर्षांची एक परदेशी स्त्री माझ्यासमोर बसून रडतेय. माझी काय अवस्था झाली असेल? कल्पना करा. पण मी ते सारं भान हरपून ऐकत होतो निश्चित. शेवटी उठताना त्यांच्या भेटीचा दिवस, वेळ नक्की केली आणि उठलो. त्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची हे मी नक्की केलं होतं. फक्त घरून निघण्याआधी फोन करम्हणाल्या. 

ठरल्या दिवशी फोन केला तर म्हणाल्या, ‘आता नको येऊस, माझी तब्येत जर बिघडली आहे. मी कळवते तुला.पण त्यांचा फोन काही आला नाही. आणि दोनचार दिवसांनी तर त्या मायदेशी परत जाणार होत्या. प्रफुल्लाबाई नंतर म्हणाल्या, ‘अरे, ती गेलीदेखील.नाहीच मिळाली त्यांची मुलाखत नंतर. गायतोंडे यांचे फोटो आणि पेंटिंग्जच्या इमेजेस त्यांच्याकडून मिळणार होत्या त्यादेखील नाहीच मिळाल्या, कारण त्यांनी जो इमेल दिला होता त्यावर मेल टाकल्यावर काहीच उत्तर आलं नाही. नंतर ग्युगेनहाईम प्रदर्शनाची संयोजक सांधिनी एकदा बोलता बोलता म्हणाली की त्यांचा इमेल आयडी बदलला आहे म्हणून; पण गप्पांच्या ओघात तिच्याकडून तो घ्यायचा राहिलाच. त्यांच्या संग्रहातली गायतोंडे यांची सारी चित्रं आणि त्या वेळचे फोटो या ग्रंथात समाविष्ट झाले असते तर या ग्रंथाचं संदर्भमूल्य निश्चितपणे वाढलं असतं यात शंकाच नाही. पण आता हळहळण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नाही हेच खरं. आता त्या बाई परत भारतात येतील का? आणि आल्याच तर मला भेटतील का? कुणास ठाऊक. आणि समजा आल्याच त्या इथं, तर मला कळणार तरी कसं? कारण त्यांना आणि मला जोडणारा जो दुवा होता प्रफुल्लाबाई, त्याच आता नाहीयेत. 

भारत सरकारनं चित्रकलेच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या ललित कला अकादमीया संस्थेचा किस्सा तर इस्से भी और आहे. त्यांच्या संग्रहात गायतोंडे यांची काही चित्रं आहेत. ती या ग्रंथासाङ्गी मिळाली तर बरं, असं म्हणून या संस्थेशी पत्रापत्री सुरू केली, पण काहीही उत्तरं आली नाहीत. सचिव, अध्यक्ष, सार्‍यांना मेल पावले, काहीच उत्तर नाही. शेवटी महाराष्ट्रातून अकादमीवर निवडून गेलेल्या दोघांना गाङ्गण्याचा प्रयत्न केला, तर एक हाताला लागला पण दुसर्‍यानं शेवटपर्यंत फोनच नाही उचलला. जो हाती लागला, तो काही दिवस नाचला, इकडे बोललोय, तिकडे सांगितलंय, याच्याशी बोल, त्याच्याशी बोल म्हणाला, पण ज्यांच्याशी बोललो त्यांनी हिंग लावूनदेखील विचारलं नाही. नुसत्या फोनची बिलं वाढली, बाकी काही नाही. 

ललित कला अकादमीच्या बहुसंख्य सभासदांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली होणारी चौकशी बहुदा तेव्हाच सुरू असल्यामुळे असेल, गायतोंडे यांच्या एकाही चित्राची इमेज ललित कलावाल्यांकडून मिळाली नाही ती नाहीच. याच ललित कलावाल्यांनी चारपाच वर्षांपूर्वी चिन्हच्या आतापर्यंतच्या अंकातला सुमारे दीडशे पानांचा मजकूर कुठलीही लेखी परवानगी न घेता हिंदीमध्ये अनुवादित करून घेऊन दोन जाडजूड ग्रंथांत बिनधास्तपणे छापला होता. त्यात गायतोंडे यांच्यावरच्या एक नाही दोन नाही 12 लेखांचा समावेश होता. त्यांचं मानधन तर सोडाच, त्या ग्रंथांची प्रतदेखील मिळवण्यासाठी मला अनंत विनवण्या कराव्या लागल्या. 

महाराष्ट्रातून ललित कलावर निवडून गेलेल्या प्रतिनिधीच्या कानांवर हे सारं घातलं, तर त्याला मी सांगितलेलं सारं कळलं असेल किंवा नाही अशी मला शंका यावी असं त्याचं वर्तन होतं. जे संसदेत महाराष्ट्राचं तेच इथंही, त्यामुळे दोष तरी कुणा कुणाला द्यायचा? आपलं सारं समाजजीवनच हळूहळू किडत चाललं आहे, दुसरं काय? असं मनाशी म्हटलं आणि कामाला लागलो. कोट्यवधी रुपये जी अकादमी केवळ भारतभरातून निवडून आलेल्या आपल्या या अशा नररत्नांच्या विमान प्रवासासाठी वर्षभरात खर्च करत असते, त्या अकादमीनं असं वागावं याची चीड आली. पण इत:पर आपण काय करू शकतो? अनेकांनी सल्ले दिले, कॉपी राईट कायद्याखाली त्यांना कोर्टात खेच. सरकारी संस्था आहे, भरपूर मोठा दावा लाव, सहज जिंकशील. खरंच आहे ते. पण हे असले धंदे करण्यासाठी का आपण हे सारं केलं? असे विचार मनात बळावले, आणि तो विचार मनातून काढून टाकला. 

*

वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे.त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.








Monday, March 9, 2015


न संपणाऱ्या शोधाची कहाणी
गायतोंडेवजा ज्ञानेश्वर नाडकर्णी


नामवंत कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी हे गायतोंडे यांचे परममित्र. तसेच ते चिन्हचे संपादक सतीश नाईक यांचेदेखील जवळचेच मित्र. किंबहुना ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या नजरेतून नाईक यांनी गायतोंडे यांना पाहिलं. पण तरीदेखील चिन्हच्या एकाही गायतोंडे विशेषांकात नाडकर्णी यांचा गायतोंडे यांच्यावरचा एकही लेख प्रसिद्ध होऊ शकला नाही. क्यों ? क्यों की, वो एक लंबीss कहानी है । पढो


८० च्या दशकातले नितीन दादरावाला यांच्या प्रदर्शनातले नाडकर्णी

मूळ तिन्ही अंकांत नसलेल्या पण या ग्रंथात नव्यानं समाविष्ट केलेल्या लेखांसंदर्भात मात्र अधिक सांगायलाच हवं. विशेषत: लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या लेखाबद्दल. आपल्यापासून इतरांना सतत चार हात लांब ठेवणार्‍या गायतोंडे यांनी आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या कॉलेज तरुणाला आपल्या इतक्या जवळ कसं काय येऊ दिलं, हा गायतोंडे आणि लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या स्नेहसंबंधातला मला सतत पडणारा प्रश्न होता. पण या ग्रंथात समाविष्ट केलेल्या लक्ष्मण यांच्या प्रदीर्घ लेखानं या आणि अशाच असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळून गेली. गायतोंडे यांच्या या सार्‍या शोधात गायतोंडे यांना झालेल्या अपघाताचे उल्लेख वारंवार येत होते, पण त्याचा तपशील मात्र कुठही येत नव्हता; त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ होतो. पण लक्ष्मण यांचा लेख हाती आला आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळून गेली. तसं पाहिलं तर हे काही गायतोंडे यांचं अधिकृत चरित्र नव्हे, पण त्यांच्या चरित्रलेखनाला लागणारी बरीच संदर्भसामग्री या ग्रंथात अगदी पुरेपूर उपलब्ध झाली आहे, याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. या लेखाच्या शेवटी लक्ष्मण यांनी गायतोंडे यांच्या अंत्ययात्रेविषयी जे मत व्यक्त केलं आहे ते तर निश्चितपणानं वाचणार्‍याला एका नवी दृष्टी देऊन जाईल. लक्ष्मण यांचा हा लेख गायतोंडेंच्या शोधातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं मी मानतो. आजवरच्या तिन्ही पुरवण्यांत प्रसिद्ध न झालेला आणखी एक लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे, तो म्हणजे पंडोल आर्ट
९० च्या दशकातले सुधीर पटवर्धन यांच्या पुण्यातल्या प्रदर्शनातले नाडकर्णी
गॅलरीचे संचालक दादीबा पंडोल यांचा लेख. त्यांचे वडील काली पंडोल हे पहिल्यापासून गायतोंडे यांचे चाहते. साठच्या दशकात त्यांनी गायतोंडे यांचा ताज आर्ट गॅलरीमधला संपूर्ण शोच्या शो विकत घेतला होता. त्यानंतर उभयतांत जो स्नेह निर्माण झाला त्याचं रूपांतर 1970 सालापासून गायतोंडे हे पंडोलचे आर्टिस्ट बनण्यात झालं. 1970 सालानंतर शेवटपर्यंत गायतोंडे यांनी पंडोलखेरीज अन्य कुणाही गॅलरीला विक्रीसाठी चित्रं दिली नाहीत. ऐंशीच्या दशकात काली पंडोल याचं निधन झालं, पण गायतोंडे यांनी तोच व्यवहार दादीबांशीदेखील चालू ठेवला. या सार्‍याचीच नोंद या ग्रंथात व्हावी असं मला अगदी मनापासून वाटत होतं. पण दादीबा यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमामुळे ते साध्य होत नव्हतं. अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांनी ग्रंथाविषयी ऐकताच मुलाखतीची वेळ देऊन टाकली. या लेखासाठी थांबलो त्याचं चीज झालं. गायतोंडे यांच्याविषयी दादीबा जे बोलले आहेत त्यानं या ग्रंथाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे, याविषयी कुणाचंच दुमत होऊ नये.

गायतोंडे यांची बालमैत्रीण शकुंतला सामंत ऊर्फ सुनीता पाटील यांचा लेख तर अगदी अचानक हातात पडला. वृत्तपत्रात आलेलं गायतोंडे यांच्याविषयीचं निवेदन वाचून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मग एका दीर्घ बैठकीत त्यांनी पन्नासच्या दशकातल्या गिरगावच्या आणि बाळच्या आठवणी जाग्या केल्या. हाही लेख या निमित्तानं पहिल्यांदाच प्रसिद्ध होतो आहे. आता इतकं लिहिल्यावरचिन्हमध्ये आधी प्रसिद्ध न झालेल्या पण इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या या ग्रंथातल्या समावेशाविषयी लिहिलं नाही तर ते योग्य होणार नाही.

कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचं गायतोंडे यांच्या विषयीचं लेखन चिन्हच्या दुसर्‍या पर्वातल्या एकाही अंकात मी प्रसिद्ध करू शकलो नाही ही एक मोठी उणीव माझ्याकडून राहून गेली, हे मी प्रथमतः मान्य करतो. मलाही स्वतःला गायतोंडे यांच्याविषयीचं त्यांचं लेखन ग्रंथात प्रसिद्ध करायला खचितच आवडलं असतं. पण तसं घडू शकलं नाही याचं कारण अखेरी अखेरीस नाडकर्णी यांच्या स्वभावात व वागण्याबोलण्यात प्रचंड मोठा बदल होत गेला हेच होय. 90च्या दशकात मी जवळ जवळ रोजच त्यांच्या सोबत जहांगीर आर्ट गॅलरीमधल्या सॅमोवररेस्टोरंटमध्ये गप्पा मारत असे. रोज दीड-दोन तासांच्या त्या बैठकीत नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत, कला, पत्रकारिता आदी विषयांवर प्रचंड गप्पागोष्टी होत असत. स्वभावतःच ते मिष्किल असल्यानं आणि त्यांचं निरीक्षण खूप सुंदर असल्यानं, मुख्य म्हणजे त्यांच्याकडे ताज्या बातम्यांचा साठा असल्यानं, त्या बैठका खूप रंगत असत. नाडकर्णी यांचा कलाक्षेत्रात मुक्त संचार असल्यानं चिक्कार बातम्या हाती लागत. नाडकर्णी फॉर्मात असले म्हणजे जे धमाल किस्से सांगत ते ऐकून हसून हसून मुरकुंडी वळत असे. गॉसिप्स तर काही विचारू नका. पण या सार्‍या गप्पा नंतर मात्र वळून वळून त्यांच्या मित्राकडेच यायच्या. हा त्यांचा मित्र म्हणजे गायतोंडे. विलक्षण आदरानं नाडकर्णी गायतोंडे यांच्याविषयीचा प्रत्येक शब्द उच्चारीत. 1997-98 नंतर हळूहळू आजारपणामुळे आणि नंतर वार्धक्यामुळेदेखील नाडकर्णी चिडचिडे होत जाताना दिसू लागले. काही कौटुंबिक अडचणींमध्येदेखील ते सापडले असावेत. त्यामुळे भेटल्याबरोबर प्रसन्न हसणारे, चेष्टा-मस्करी करणारे नाडकर्णी, अनेकदा त्यांना काही विचारलं तर वसकन अंगावर येत. याच काळात माझं कार्यालय फोर्टमधून लालबाग परिसरात हलवलं गेल्यानं त्यांचा रोजचा संपर्कदेखील साहजिकच कमी कमी होत गेला. त्यांच्याशी फोनवर बोलणंदेखील नंतर नंतर दडपण आणणारं वाटू लागलं. त्यामुळेच की काय कुणास ङ्खाऊक, गायतोंडे यांच्यावरच्या पुरवण्यांसाठी मी त्यांच्याकडून लेख लिहून घेतला नसणार. पण 2001 सालची पहिली पुरवणी प्रसिद्ध होताच एके दिवशी सकाळीच नाडकर्णींचा फोन आला, ‘अहो काय अंक काढलायत? ग्रेट! ग्रेट!आणि मग अंकाविषयी ते खूप कौतुक करणारं बोलत राहिले. अचानक त्यांचा आवाज चढला. म्हणाले, ‘माझ्याकडून तुम्ही गायतोंडेवरचा लेख का नाही घेतला? माझा चांगला मित्र होता तो. मी काय तुमच्याकडून पैसे घेतले असते?’ एक ना दोन, बरंच काही बडबडले, पण उत्तर देण्यास संधी न देता फोन ठेवून मोकळे झाले.

नंतरही नाडकर्णींना अंक जातच राहिले. तोपर्यंत नाडकर्णीनीं मुंबई सोडली होती आणि ते पुण्याला स्थायिक झाले होते. ते मुंबई सोडून कधी पुण्याला गेले हेदेखील नीटसं कळलं नाही. पण खूप वाईट अवस्थेत ते पुण्याला गेले एवढं मात्र कळलं. उदाहरणार्थ, सामानाच्या टेंपोसोबतच मुंबईपुणे प्रवास त्यांना करावा लागला वगैरे. हे ऐकल्यावर मन खिन्न झालं. पण ज्यानं हे घडवून आणलं त्याला मात्र त्याचं काहीच वाटलं नाही याचं विशेष दु:ख झालं. 2006 साली गायतोंडेंच्या शोधात...अंक प्रसिद्ध झाला तेव्हाची ही गोष्ट. तोपर्यंत नाडकर्णीच्या स्वभावात प्रचंडच बदल झाले होते. आता तर ते चित्रकारांचे फोन घेणंदेखील टाळू लागले होते... आणि अंक पोचताच एके दिवशी सकाळी त्यांचा फोन आला. पुन्हा तेच, प्रचंड कौतुक आणि मग नंतर प्रचंड संताप. पुन्हा तोच प्रश्न, ‘तुम्ही का नाही माझ्याकडून लेख लिहून घेतलात?’ आणि पुन्हा तेच - उत्तराची संधी न देता खाडकन फोन ठेवणं. फोन ठेवता ठेवता म्हटलेलं त्यांचं वाक्य माझ्या पक्कं लक्षात आहे, म्हणाले होते, ‘चित्रकारांशी आता याउप्पर मी पुन्हा कुठलेही संबंध ठेवू इच्छित नाही, मला फोन करू नका.आणि खडाक. फोन ठेवलादेखील.

अशा या परिस्थितीत त्यांच्याकडून लेख घेणं तरी कसं शक्य होतं? गायतोंडे यांच्यावरचे त्यांचे लेख मी तिन्ही अंकांत घेऊ शकलो नाही याचं वैषम्य त्यांच्यापेक्षा मला अधिक आहे. या ग्रंथाचं डिझायनिंग होऊन तो पूर्ण होताच नाडकर्णी यांचा लेख या ग्रंथात नसणं ही या ग्रंथातली सर्वात मोठी त्रुटी मला जाणवली... पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नाडकर्णी या जगात राहिले नव्हते. म्हणून मग एके दिवशी नाडकर्णी यांनी गायतोंडे यांच्यावर लिहिलेली सारी कात्रणं वाचून काढली आणि अखेरीस निवडक चिन्हच्या संकल्पनेत बसत नसतानाही त्यांच्याच अश्वत्थाची सळसळया पुस्तकातून गायतोंडे यांच्यावरचा लेख पुनर्प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

अशा प्रकारे नियम मोडल्यावर मग गायतोंडे यांच्यावरचा लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला फिरोझ रानडे यांचा लेख यात का नको, असा प्रश्न मला पडला आणि रानडे यांचा लेख या ग्रंथात दाखल झाला. त्यांच्या पत्नी नामवंत लेखिका प्रतिभा रानडे मला म्हणाल्या, ‘नाईक, थोडं जर आपण आधी भेटलो असतो तर यांनी तुम्हाला गायतोंडे यांच्याविषयी खूप नवी माहिती दिली असती. खूप आठवणी सांगायचे ते गायतोंडे यांच्याबद्दलच्या.तेव्हा मात्र मी खूपच हळहळलो. कारण ऐंशी-नव्वदच्या दशकात मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो त्याच्या कार्यालयात रानडे सहकुटुंब अनेकदा येत असत, ते त्यांच्या अनेक पत्रकार मित्र-मैत्रिणींशी भरपूर गप्पा मारीत असत. पण तेव्हा कधी गायतोंडे यांचा विषय निघाला नाही. त्यांनी लोकसत्तेत लेख लिहिला तो देखील 2005 साली. पण तोपर्यंत मी पत्रकारिता सोडली होती. खरं तर गायतोंडेंच्या शोधात...हा अंकदेखील 2006 साली दिवाळीत प्रसिद्ध झाला होता, मग माझ्याकडून ही चूक कशी राहून गेली याचं मला आजही राहून राहून नवल वाटत राहतं. आयुष्यात समोरून चालून आलेल्या संधी या अशा सोडायच्या नसतात हा धडा मी यातून शिकलो खरा, पण मला वाटतं, नव्यानं शिकून चुका सुधारण्याची वेळ आता कधीच निघून गेलेली आहे. आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अशा अनेक गोष्टी मला आज अस्वस्थ करतात, कमीअधिक काळ औदासिन्य आणतात, पण यातच मानवी आयुष्याचं अपुरेपण सामावलेलं आहे अशी मी माझ्याच मनाची समजूत काढतो आणि अस्वस्थता झटकून नव्या उमेदीनं कामाला लागतो.

 वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.