Monday, November 26, 2018

वाचता वाचता

झेनच्या सहजस्फूर्त निर्मितीचा
सहज सुंदर आदर्श  : ‘गायतोंडे’ग्रंथ !

-  प्रदीप  सं नेरुरकर
भाग १

एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात चाळीत राहणारा माणूस स्वतःच्या कल्पनेतलं अदभूत विश्व साकारण्याचा कल्पनेनं झपाटलेला, अगदी लहानपणापासून चित्रकला विषयात अतीव रस असलेला, या चित्रांपुढे बाकी सर्व संसारावर तिलांजली देऊन कलेच्या एकाच ध्यासाने पछाडलेला. जेव्हा साऱ्या भौतिक सुखांकडे पाठ फिरवून चित्रकलेचं एक अत्युच्च शिखर गाठतो आणि आपण आपलं ध्येय पूर्णतः गाठलंय हे मग कळून न कळूनही त्यापलीकडच्या एका योग्याच्या व ऋषीच्या जीवनाच्याही पल्याड पोचतो त्या प्रवासाची एक अदभूत झलक आपल्याला ‘ गायतोंडे’ नावाच्या ‘चिन्ह’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या देखण्या अप्रतिम ग्रंथात वाचायला मिळते.
प्रथमदर्शनीच अत्यंत सरळ सोपं साधं काळ्या पांढऱ्या रंगातलं ‘गायतोंडे’च्या चित्राच्या पार्श्वभूमीवर विचारात बसलेले गायतोंडे त्यांच्या चित्रांतल्या अक्षराकारातच सामावून गेलेले दिसतात. फक्त ‘गायतोंडे’ शीर्षकाची अक्षरे केवळ आपल्याला दिसतात. चांगला, सुंदर, देखणा कागद नि त्यावरची नेमकीच नजरेला सुखावणारी छपाई त्यांतली चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांची अदभूत चैतन्यमय चित्रे, रेखाचित्रे आणि त्यांची दुर्मिळ छायाचित्रे यामुळे हा ग्रंथ सहज सुस्वरूप झालाय. जसं संपादक सतीश नाईक यांनीच म्हटल्याप्रमाणे “कुठलीच गोष्ट ओढून ताणून करायची नाही. ग्रंथ निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात जे जे घडत गेलं, ते ते तसं तसं घडून देत गेलो.” हे असं काहीसं झेन तत्वच संभाळून त्यांनी जरी या ग्रंथासाठी काही काळ गेला तरी झेनच्याच सहजस्फूर्त निर्मितीचा एक सहज सुंदर आदर्शच आपल्यासमोर ठेवलाय यात शंकाच नाही. यासाठी त्यांनी घेतलेले अपरंपार कष्ट, मनःस्ताप, संकटं नि अरिष्ट यावर न खचता केलेली मात, तसेच या कामातल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक गुंतवणूक यावरही आपली पत्नी नीता नाईक हिच्या खंबीर पाठबळामुळे केलेली मात ही नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे. 

‘चिन्ह’ प्रकाशनने दुसऱ्या पर्वात २००१ पासूनच ‘गायतोंडे’ विशेषांक (२००१, २००६ व २००७) ‘भास्कर कुलकर्णी’ विशेषांक (२००३) ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ ‘यत्न-प्रयत्न’ विशेषांक असे नवनवे नि नव्या जुन्या मराठी चित्रकारांवरचे अंक एखाद्या कला चळवळीच्या उत्साहाने काढले आहेत नि त्याला उत्तम प्रतिसादही मिळालेला आहे. चित्रकारितेबरोबरच उत्तमी पत्रकारिता नि खास नजर असलेल्या सतीश नाईक यांच्या ‘चिन्ह’ कला चळवळीचा ‘गायतोंडे’ हा ग्रंथ ‘कळसाध्याय’ म्हटला तर अतिशयोक्ति होणार नाही.

‘गायतोंडे’ या ग्रंथाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात एकूण चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांच्या घरातला, शहरातला जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा नि त्या नंतरच्या आयुष्याचा केवळ चित्रकलेचा प्रदीर्घ प्रवास विलक्षण ताकदीने या सर्व लेखकांनी सादर केला आहे. त्यात गायतोंडेंचा स्वभाव, त्यांची स्फूर्ती व श्रद्धास्थाने, तसंच त्यांचं विचारविश्व आणि कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रदर्शने व स्वतःची कला यावरची वेळोवेळी केलेली भाष्ये नि मते अत्यंत वेधकपणे मंडळी आहेत. त्यातून गायतोंडेंचं विलक्षण व्यक्तिमत्व साकार झालंय.

गायतोंडेंच्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगायचं तर गिरगावातल्या कुडाळदेशकर वाडीतलं चाळीतलं अडीच खोल्यांचं असलेलं त्यांचं घर. चौकोनी कुटुंबात ते स्वतः, प्रेमळ आई, दोन बहिणी व कडक स्वभावाचे गायतोंडेंना लहानपणी चित्रकलेला विरोध करणारे वडील. घरातल्या विचित्र वातावरणामुळे लहानपणी जे जे स्कुलमध्ये शिकतांना झालेली चित्रकाराची घुसमट. वडिलांची त्या काळी असलेली दहशत, तिला तोंड देऊन सतत चित्रे काढणारा बाळ गायतोंडे. हा त्यांची बहीण किशोरी दास यांनी लिहिलेल्या लेखातच “बाळ हा चित्रकार म्हणून जन्माला आला होता.” ही असलेली जाणीव नि पुढे जिच्याशी झालेला दुरावा नि बाळचा पुढील आयुष्याचा कलाप्रवास विस्ताराने त्यांनी कौटुंबिक पद्धतीने मांडला आहे. 

‘गायतोंडे’ या ग्रंथात A4 साईझच्या मोठ्या आकाराची २१६ पृष्ठे असून एकूण सोळा लेख असून कौटुंबिक विभागात किशोरी दास (बहीण), शांताराम वर्दे वालावलीकर (आतेभाऊ), सुनीता पाटील (शेजारीण) यांचे तर जे जे स्कूल्सही संबंधित विश्वास यंदे, फिरोझ रानडे, प्रफुल्ला डहाणूकर, मनोहर म्हात्रे व सच्चिदानंद दाभोळकर या सहकारी शिष्य मित्रांचे, तसेच लेखक पत्रकार ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि शरद पाळंदे, लक्ष्मण श्रेष्ठ, दादीबा पंडोल, नरेंद्र डेंगळे यांचे गायतोंडेंच्या कलासमीक्षासंबंधीचे लेख व शेवटी सुनील काळदाते व नितीन दादरवाला यांचे गायतोंडेंवर केलेल्या फिल्मसंबंधी लेख, याबरोबरच गायतोंडेंनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतीतील निवडक मुलाखती, श्री निसर्गदत्त महाराजांशी झालेला संवाद आणि ‘नवकला आणि मी’ हा खुद्द गायतोंडेंचा लेख. त्याबरोबरच रंगीत नि श्वेतधवल २९ प्रकाशचित्रे तसंच ५५ रंगीत चित्रे शिवाय कृष्णधवल प्रकाशचित्रे यांचा या पुस्तकात समावेश आहे. याबरोबरच या प्रकल्पाचे नि ‘चिन्ह’ प्रकाशनाचे संपादक सतीश नाईक यांचं या पुस्तक निर्मिती करतानाचे काही काळाचे खडतर अनुभव सांगणारी २४ पृष्ठांची ‘गायतोंडे - एक न संपणाऱ्या शोधाची कहाणी’ विशेष पुरवणी म्हणून या ग्रंथाबरोबरच देण्यात आली आहे. तीही खचितच वाचनीय आहे. या ग्रंथासाठी सतीश नाईकांनी किती अपार मेहनत नि कष्ट घेऊन प्रांजळपणे सांगितलेल्या या हकीकतीमुळे कळते की त्यांनी घेतलेले श्रम खरोखरच सार्थकी लागलेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रभाकर कोलते यांनी मांडलेल्या ‘बाकी इतिहासा’तूनही त्यांनी या ग्रंथाला केलेलं अमोल सहाय्य, अप्रतिम साठा नि भरघोस पाठिंबा यामुळे आज हा ग्रंथ अत्यंत दिमाखात प्रसिद्ध झालाय. त्यात गायतोंडेंची चित्रं पाहतानाचा जो अनुभव व्यक्त करतात, तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. ते म्हणतात “केवळ त्यांचं चित्र, कुठल्याही उत्प्रेक्षा-उपमेशिवायचं फक्त चित्र. मला दिग्मूढ करणारं. त्या वेळी प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावणारी माझी साक्षर बुद्धिमत्ता चक्क मला सोडून गेली. माझ्या शरीरातली एकूण-एक इंद्रिये, हाडामांसासकट मला न सांगता पसार झाली आणि मी मग एक संवेदनशील हवेनं लठ्ठ फुगलेला फुगा होऊन उरलो….”

गायतोंडेंना जे. जे. चे ग्रंथपाल विश्वास यंदे यांनी पॉल ब्रॅंटनचं ‘ए सर्च इन सिक्रेट इंडिया’ हे बहुधा त्याच्या भारतातल्या आध्यात्मिक जीवन प्रवासाविषयीचं पुस्तक प्रथम वाचायला दिलं. पुढे रमण महर्षीचंही पुस्तक त्यांनीच देऊन गायतोंडेंना अध्यात्माची गोडी लावली आणि अशी पुस्तके नि त्यांचं वाचन त्यांना चिंतनाकडे घेऊन गेलं असावं. पण बहुधा त्यांची वृत्ती तशी असावी म्हणूनच संत सोहिरोबानाथ आंबिये अभंगांचं पुस्तक वाचून त्याना - “जब सोहिरा सोहं तख्तपर बैठे” या ओळी वाचून सोहिरोबांचं तख्त कुठचं याची उत्सुकता निर्माण झाली. “मी काही करीतच नाही. पेंटिंग आपोआप घडतं.” किंवा “जे मुळात आहे, तेच मी साकारलं.” , “मी मौनात गेलो.” अशी वक्तव्ये - त्यांचा दाखला विश्वास यंदे देतात. त्याच्या मते गायतोंडेंना अखेरच्या काळात झालेला अपघात नि त्यामुळे आलेलं अपंगत्व ही नियतीचीच जणू परीक्षा होती. नि त्यातूनच ते पुढे सिद्ध झाले असेही ते म्हणतात. त्यांच्या चित्रांमागची तपश्चर्या व चित्र पूर्ण झाल्यानंतरची विरक्तीही ते जाणतात. 
तर प्रफुल्ल डहाणूकरांच्या लेखात जे. जे चे नि भुलाभाई संस्थेचे ‘फुलपंखी दिवस’ आठवतात आणि हुसेन बी. प्रभा, बी. विठ्ठल, नसरीन मोहंमदी, मनोहर म्हात्रे या ग्रुपबरोबर केलेल्या भटकंती चित्र प्रदर्शने चर्चा नि वादविवाद - त्यातलं स्मरणरंजन, चिंतनमग्न ‘गाय’ सांगतांना, ते “माय पेंटिग्ज आर झेन” असं म्हणत, त्यांच्या घरात उठलेली भावनांची वादळे शमवण्यासाठीच तो अध्यात्माकडे वळला असं मत त्या व्यक्त करतात.

या पुस्तकातला एक महत्वाचा लेख आहे. मनोहर म्हात्रे यांचा. त्यांच्या मते “आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नचिन्हाला त्यांनी आपल्या चित्रांचा विषय बनवला.” असं म्हणतांना वास्तवाचं त्याच्या चित्रातलं रूपच जणू ते शोधतात. म्हात्रे त्यांचे शिष्य व नंतर मित्रही गायतोंडेंचं प्रभावी व्यक्तिमत्व त्यांनी सोबतीनं पाहिलेले ‘लास्ट फॉर लाईफ मूला रुजू, बा ‘गॉन विथ द विंड’ हे चित्रपट “आजूबाजूच्या माणसातला आनंद शोधा”, व “चित्र हे स्वानंदासाठीच मी रंगवतो.”

“प्रत्येक चित्र स्वयंभू असून आपल्या आवडीचा चित्रकार निवडून त्याद्वारे भूतलावर उतरतं.” अशी भाषा चित्रकार वापरतो, तेव्हा तर त्यांची अध्यात्मवृत्तीच प्रगट होते म्हटलं तर चूक ठरू नये. गंमत म्हणजे मनोहर म्हात्रे हे ज्योतिष पाहणारे असूनसुद्धा यांनी कधी आपलं व कुणाचं भविष्य पाहण्याची उत्सुकतासुद्धा दाखवली नाही. आणखी एक म्हात्रे सांगतात - स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या चित्रांची त्यांनी कधीच किंमत केली नाही. “माझ्या जगण्यावर कोणाचा अधिकार नाही.” असं स्वाभिमानानं सांगणाऱ्या गायतोंडेंना जीवनातल्या परम-पदापर्यंत पोहोचलेली माणसं सतत खुणावत राहिली. असा निष्कर्ष म्हात्रेच काढू शकतात.

सच्चिदानंद दाभोळकरही त्यांच्या लेखात “पेंटिंग सहज झालं पाहिजे.” आणि “आर्टिस्ट जसजसा मोठा होत जातो. तसतसा तो सोपेपणाकडे वळतो.” हे निरीक्षण नोंदवतात.

शरद पाळंदे, लक्ष्मण श्रेष्ठ व नरेंद्र डेंगळे यांचे तीन लेख विविध भूमिकांतून गायतोंडेंच्या चित्रांविषयीच बोलतात. त्याचं कला विश्लेषण, आस्वाद नि स्वरूप यावरच त्यांचा सारा भर असतो. त्यांच्या चित्रांविषयी तिघानाही जबरदस्त कुतूहल आहे नि जे त्यांच्या चर्चेतून नि पाहण्यातून पुरेपूर वसूल करतात. आपल्या स्नेहाची नि आनंदाची पावती स्वखुशीने देतात. गायतोंडेही ज्यांच्याशी त्यांची नाळ जुळते त्यांच्याशी एकरूप होऊन संवाद करीत असत. कुणालाही दुखावणं त्यांना जमत नसे.

शरद पाळंदे म्हणतात की गायतोंडे हे जीवनाचा आनंद घेणारे व घ्यायला लावणारे होते. स्वतःच्या आखलेल्या चौकटीच्या बाहेरच्या लोकांपासून ते अलिप्त रहायचे. स्वतःचा थांग दुसऱ्याला जाणीवपूर्वक लागू न देणारं हे अजब रसायन होतं. ते समुद्राकडे एकटक पहात तासनतास बसत. लाट कशी येते, नि कशी जाते ? त्यांच्या मते जाताना ती लाट तुमच्यातलं काही तरी नेत असते ? ते काय तर ती एनर्जी नेते - अफाट वाचन नि मनस्वी चिंतन हेच त्यांचं जीवन. ते कृष्णमूर्तीच्या तत्वज्ञानावर बोलत माणसाच्या जगण्याचं प्रयोजन काय ? जीवनाच्या प्रवासात तो काय शोधतो ? हे त्यांचे गहन प्रश्न असायचे. त्यांनी कलेचं कधी अवडंबर केलं नाही. मेंदू, हात, ब्रश, रंग नि कागद या सगळ्यांचा संबंध ज्या प्रेरणेनं साधला जातो, तो त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा होता.
अपूर्ण...

वाचता वाचता

झेनच्या सहजस्फूर्त निर्मितीचा
सहज सुंदर आदर्श : ‘गायतोंडे’ ग्रंथ !
भाग २

. प्रदीप  सं नेरुरकर 



तर लक्ष्मण श्रेष्ठ नि गायतोंडे यात एका पिढीचं अंतर असूनसुद्धा ते मित्र होऊ शकले, कारण त्यांच्या ‘शांततेचा भंग’ न करणारा म्हणून तो आवडला. लक्ष्मण म्हणतात “त्यांची बोलण्याची गरज खूप कमी होती.” शांततेचे रिकामे अवकाश त्यांना आवडायचे. स्वतःतच रमण्याची वृत्ती. ते म्हणायचे “पेंटिंगमध्ये किंवा आयुष्यात एकही जास्तीची गरज नसलेली गोष्ट आली की ते बिघडतं.” म्हणून ते सदैव जीवनात दक्ष रहात. “सगळ्यातून एकेक गोष्ट कमी करत जायची, मग त्यात शेवटी शिल्लक राहतो तो इसेन्स वा गाभा.” “गायतोंडे नि निसर्गदत्त महाराज यांच्याकडून मी स्वतःतल्या सत्याशी प्रामाणिक रहायला शकलो.” असं अमूर्त चित्रकार श्रेष्ठ म्हणतात. गुरु शिष्यांचा अत्यंत सहज अनाग्रही संबंधांचा नि मूर्तिमंत सौहार्दाचा प्रत्यय त्यांचा लेख आपल्याला देतो.


१९७४ ते १९८३ या काळात दिल्लीत राहणारे नरेंद्र डेंगळे यांचा गायतोंडेंशी घनिष्ठ संबंध आला होता. त्यांनी त्यांच्या चित्रांचे केले विश्लेषण अत्यंत संवेदनशील मानाने केले आहे. ते त्यांना वेळोवेळी भेटत असत. त्यांच्या चर्चाही होत असत. गायतोंडेंच्या चित्रांविषयी लिहिताना ते म्हणतात “त्यांची कला नैसर्गिक, आत्मशोधक व जागृत जीवनाचा एक सहज अविष्कार होता.” त्यांच्या मते “रंग आकार नि पोत हेच दृष्यकारांना पहायचे निकशबिंदू होत.” गायतोंडेंची उदृत केलेली ही काही उदाहरणे “झेनमधे सर्वात महत्वाची उत्स्फूर्तता व तत्परता. ती ताजी ठेवणं महत्वाचं आहे. “ “सौन्दर्यानुभवात स्मरणशक्तीला स्थान नसतं. कला, आस्वाद व निर्मितीसाठी सदैव जागरूकतेची गरज असते.” तसंच “रंगचित्रणाच्या प्रक्रियेत विचारांना थारा नसतो.” “झेन म्हणजे एका क्षणात होणारी चित्रकार, रंग व कॅनव्हास या सर्वांची युती होते. सर्व समलय होतं.” “रंगचित्रणाची स्फूर्ती केव्हाही, कुठेही उगवते - कधी मासिक चाळताना, नृत्य बघताना, सिनेमा बघताना, वा हालचालीच्या गतीमध्ये.”  

 “बुद्धाची असीम शांतता जर लाभली, तर माझं रंगचित्रण आपोआप थांबेल.”
“कलाकार दुःखात बेचैन असताना सुंदर कलाकृती घडवू शकत नाही.” “चित्र रंगवताना कॅनव्हासपुढे मी विस्मयपूर्ण अवस्थेत उभा असतो.” आणि शेवटचे वाक्य “कलानिर्मिती ही ईश्वरकृपा आहे आणि म्हणूनच वैयक्तिक यशाची गुढी नव्हे.” ही वक्तव्ये खासच प्रतिभाशाली व्यक्तीच्या संवेदनाच व्यक्त करतात. गायतोंडेंच्या स्वभावाचेही - अबोल, अंतर्मुखी, मनस्वी स्वतःमध्ये परिपूर्ण, जीवन आणि चित्रकला यामध्ये तल्लीन असं डेंगळेनी वर्णन केलं आहे.

गायतोंडेंना संगीतकार बारवच्या संगीतात खास रस होता. तसंच हिंदुस्थानी व्हायोलिन हे वाद्य कायम दुःखाशीच जोडलेलं का असावं ही त्यांची खंत होती. “प्रेमात मी सुदैवी आहे.” असे उद्गार ते काढीत असत.

गायतोंडेंची चित्रं ज्या मुंबईच्या पंडोल गॅलरीतून विकली जात तिचे मालक दादीबा पंडोल यांनी लिहिलेल्या लेखात गायतोंडेंचा सहज उदार दृष्टिकोन, चित्रांविषयीची कसलीही, कोणतीही मागणी नसणं नि त्यांचं अध्यात्मिक चिंतन याविषयी ते लिहितात. त्यांच्या आयष्यभर जी परिस्थिती त्यांच्यासमोर आली तिला ते विनातक्रार सामोरे गेले. त्यांच्यापुढे भौतिक सुखाचा विचार नव्हता - असं स्पष्ट प्रतिपादन ते करतात. ते फक्त वर्तमानात कसे जगात होते ते सांगून त्यांच्या अनाग्रही स्वभावाची वाखाणणी दादीबा करतात. त्यांच्या मते “पेंटिंग हा त्यांचा खाजगी अवकाश होता.” हे निखळ सत्य आहे. शेवटी शेवटी ते त्यांच्याशी अस्खलित गुजरातीत बोलल्याचं नंतर त्यांना आश्चर्य वाटतंय.

सुनील काळदाते पॅरिसचे रहिवासी. यांनी गायतोंडेंवर १९९५ मध्ये जी २६ मिनिटांची  तयार केली त्यावेळच्या दिल्लीतल्या त्यांच्या स्टुडिओतल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात “सुरवातीला संगीतकार शुबेरवरून माझी व त्यांची वेव्हलेंग्थ जुळली.” संगीताने जोडला गेलेला माणूस तुटत नसावा. एका ऋषीसदृश जीवन जगलेल्या कलावंतांवर त्यांच्या दिनचर्येत कुठेही व्यत्यय न आणता त्यांच्या स्टुडिओत चित्रण करायचं, या अटीवर काम करण्याचं आव्हान सुनीलने पेललं नि एका अप्रतिम फिल्मचा जन्म झाला. तिला पॅरिस बिनाले आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आलेल्या आठशे फिल्म्सपैकी निवडक फिल्मचा मान तर मिळालाच पण त्यांच्या कलाजगतात जगभर कौतुक झालं. गायतोंडेंवर निर्माण झालेली ती एक दुर्मिळ फिल्म त्यांत सुनीलने जे दिसतंय जे घडतंय तेच फिल्ममध्ये चित्रित केलंय.

गंमत म्हणजे या फिल्मसाठी वापरायला खास निवड करून आणलेली शुबेरची संगीत कॅसेट नि त्याच संगीताची गायतोंडेंकडे असलेली ग्रामोफोन रेकॉर्ड नेमकी तीच निघावी हा अतर्क्य असा योगायोग होता की चमत्कार की अंतःस्फूर्तीचा प्रकार होता. पण हे सारं विलक्षण गायतोंडेंच्या बाबतीत घडलं यात काहीच विशेष नाही… नसावं की नियतीचा खेळ की केवळ झेनचं साक्षात घडणं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गायतोंडेंनी ही स्वतःवरची फिल्म पाहिलेली नाही. तो योग मात्र आला नाही, हेही अतर्क्यच. पण गायतोंडेंसाठी तर ठीकच. त्यांनी आयुष्यभर जी निरिच्छ वृत्ती दाखवली ती काय वाया थोडीच जाणार ? सदैव विरक्त स्थितीतला हा त्यागी कलावंत नाहीतर प्रीतीश नंदीला दिलेल्या मुलाखतीत म्हणूनच राहिलाय ना “मी संन्यासी आहेच.” फकिरी जीवनाचा बाणा पत्करणाऱ्या कलाकाराला नियतीने केलेला हा एक सलामच !

नितीन दादरावाला यांच्या लेखात सुनील काळदातेबरोबर फिल्म चित्रित करण्यासाठी गेले असताना १०-१२ दिवसात त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा गोषवारा दिलाय. एक चित्रकार आपलं आयुष्य कसं व्यतीत करतो, त्याचे आदर्शच या लेखात दिसून येतात. नितीनच्या लेखात गायतोंडेंमुळे झालेली ‘झेन’ तत्वज्ञानाशी त्याची ओळख व त्या तत्वज्ञानाचा त्याच्या जीवनावर झालेला सहज परिणाम व त्यांच्या पेंटिंगच्या तंत्राबद्दल विस्ताराने अमूल्य माहिती आलीय. त्यांची काही सूत्रबद्ध वचनं खरं तर मनात चिंतन करण्यासारखीच आहेत.
 
उदा . "माझं पेंटिंग हे एका व्यक्तीच नाही, तर ते मानव जातीच्या वारशाचं पेंटिंग आहे.
- झेनमुळे मी प्रत्येक कृतीविषयी जागरूक झालो.  प्रत्येक गोष्टीकडे तत्वज्ञात्मक दृटीने पाहायला लागलो"
- पेन्टिंग करणं हे समाधीसारखंच आहे." "रमण महर्षी, पॉल क्ली  हे माझे गुरु होते."
- "भक्तिमार्गाचा शेवट म्हणजे ज्ञानमार्ग"
आणि त्याच एक अतिशय महत्वाचं नि जीवनाचं जणू सार सांगणारच वक्तव्य आहे, ते म्हणजे
- "यु कॅन नॉट पझेस एनीथिंग" (कुठलीही गोष्ट तुमच्या मालकीची नसते.) यालाच समांतर अशा अर्थच एक वाक्य गायतोंडे मनोहर म्हात्रेंकडे बोलले होते ' ते होत -
- " माझ्या जगण्यावर कोणाचा अधिकार नाही " वास्तवाची एवढी सूत्रबद्ध मांडणी एखाद्या विरक्त माणसाशिवाय आणखी कोण करू शकतो ?
हा तर खराखुरा सन्यासी चित्रकार. सर्वांच्या पल्याड पोहोचलेला, अंतर्यामी स्थिरचित शांत असलेला. केवळ स्व-स्वरुपात विलीन होणारा, विसर्जित झालेला.

तरीही या लोभस पुस्तकातल्या गायतोंडेंच्या मुलाखती नि संवाद या गोष्टी माझ्याकडून अस्पर्शितच  राहिल्यात याची मला जाणीव आहे. त्यात तर त्यांच्या प्रतिभादर्शी व्यक्तिमत्वाच्या ज्ञानाचा, विचारांचा, कलेचा, सौदंर्यदृष्टीचा नि संवेदनांचा खजिनाच भरलाय. या मुलाखतींपैकी काही मुलाखतींची अनुवाद करण्याची संधी सुदैवानं  मला मिळाली त्यामुळे या पुस्तकाशी जडलेलं माझं नातं हे खरोखरीच अमोल आहे. या पुस्तकाचं वाचन हा एक अतिशय आनंददायक भाग आहे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आपण त्याच्या मोहात पडतो. साऱ्या कलावंतांनी चित्रकार, शिल्पकार, नर्तक नट - नट्या याचबरोबर कलेचे विद्यार्थी कलासंस्था, वाचनालये, सार्वजनिक संस्था, म्युझियम, आर्ट गॅलऱ्या नि सर्व कलाविषयक उपक्रमातील सर्वानी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि  संग्रही ठेवावं असंच आहे यात तिळमात्र शंका नाही. यासाठी "चिन्ह" प्रकाशन व ‘गायतोंडे’ ग्रंथाचे सर्व लेखक, अनुवादक, प्रकाशचित्रकार, सहकलाकार व पूर्ण सहकारी या सर्वांच्या परिश्रमांमुळे हा ग्रंथ सर्वार्थाने एक देखणा अभिजात ग्रंथ झालाय.

गायतोंडेंच्या रंगचित्रांतून सतत काहीतरी स्फुरल्यासारखं वाटत राहतं. चैतन्यदायी स्पंदन त्यातून अविरत व्यक्त होत राहतात. त्यांनी निसर्गातून नि तत्वज्ञानातून जे नि जसं कांही पाहिलं ते त्यांच्या चिंतन-मननातून नि वाचनातून आपसूकच चित्रात प्रगट होत राहिलं. झेन बुद्धीझमच्या वाचनामुळे त्यांचा मानसिक रियाझ उत्तम झाला होता. अत्यंत  शांत निर्विकार मनाने एकदा का ते कॅनव्हास पुढे उभे राहिले, की त्यांना उत्स्फूर्तपणे पेंटिंग सुचत राही. रंग नव्याने उमगत. त्यांना चित्रांसाठी मूळ प्रेरणा रंगातूनच मिळत.
त्यांच्या चित्रातल्या रंगांची आभा विलक्षण नवी असायची आणि ती चित्रं पाहताना अदभूताचं नि विस्मयाचं दर्शन व्हायचं. अन्यथा एका भयंकर जीवघेण्या अपघातातून सावरलेल्या गायतोंडेंनी एवढी नियतीवर मात करणारी श्रेष्ठ कला निर्माणच केली नसती .

खरं म्हणजे वासुदेव गायतोंडे हे एका प्रकारे पौर्वात्य घाटणीचे व विचारसरणीचे खरेखुरे देशी चित्रकार होते असं म्हणणं कदाचित जास्त योग्य ठरेल. त्यांची चित्रही शांत, उद्दात, निरागस व काहीशी अमूर्त वाटतात. सतत एका अज्ञाताचा, अमूर्ततेचा त्यांना ध्यास होता. कलेचं हाती घेतलेला वसा त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. संत सोहिरोबानाथ आंबिये यांचं एक प्रसिद्ध पद आहे. त्यात ते म्हणतात - "हरिभजनावीण काळ घालवू नको रे ! अंतरीचा ज्ञानदीप मालवु नको रे !!” त्यांच्या अभंगाशी गायतोंडे यांचं जणू एक अतूट नातं असावं आणि म्हणूनच त्यांच्या चैतन्यमय, ओजस्वी रंगातल्या असंख्य रंगचित्रांतूनच, त्यांच्या अंतर्यामीच्या सौन्दर्यदृष्टीचा रंगोत्सव - ज्ञानोत्सव असाच अविरत उजळत राहिलाय…

समाप्त  …
या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी फेसबुकाच्या गायतोंडे पेजला भेट दया !

https://www.facebook.com/Gaitonde%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-164757170298118/?ref=bookmarks

निवडक चिन्ह च्या सवलत योजनेत सहभागी व्हा आणि ३००० रुपये किमतीचा गायतोंडे महाग्रंथ चक्क भेट मिळवा.
अधिक माहितीसाठी 90040 34903 या नंबरवर फोन करा किवा whatusp मेसेज करा.