Thursday, April 17, 2014

भेट गायतोंडे यांच्या कुडाळदेशकर वाडीतल्या शेजारीणीची …


'गायतोंडे' ग्रंथाची बातमी मटा, लोकसत्ता मध्ये झळकताच एका सकाळी फोन वाजला, कुणी तरुणी असावी पलीकडे, सतीश नाईक बोलतायत ना असे विचारून 'थांबा हं, आईना फोन देते' असे म्हणून फोन कुणाकडे तरी दिला. पलीकडून एक खणखणीत आवाज ऐकू आला 'मी शकू म्हणजे शकुंतला सामंत, गायतोंडे यांची कुडाळदेशकर वाडीतली शेजारीण, गायतोंडे आणि आम्ही अगदी शेजारी शेजारी राहत होतो, माझं आताचं नाव सुनिता पाटील मला तुम्हाला भेटायचं आहे. गायतोंडे यांच्या संदर्भात मी तुम्हाला खूप माहिती देवू शकेन. बाई ठासून आणि एका दमात सांगून गेल्या. मनात म्हटलं बाई कुठल्या तरी शाळेत शिकवत असणार, नंतर झालेल्या त्यांच्या सोबतच्या भेटीत तो अंदाज खरा ठरला, त्या बालमोहन मध्ये शिक्षिका होत्या. 

त्यांच्या सोबत तीन चार तास तरी होतो, बाई खूप बोलत होत्या, वाचन प्रचंड असल्याचं जाणवतच होतं. त्यामुळे गप्पा मारताना खूप नव्या गोष्टी कळल्या. बोलताना संभाषणात आलेल्या माणसांच्या लकबी किंवा नकला करून दाखवण्याची बाईना संवय, साहजिकच गप्प रंगल्या नसत्या तर नवल. सुमारे ५०-६० वर्षाच्या गिरगावात बाईनी आम्हाला अलगद फेर फटका मारून आणलं. गिरगावात माझं आजोळ असल्यानं मीही काही काळ स्मरण रंजनात गुंगून गेलो होतो . विशेषतः रेडीओच्या, आकाशवाणीच्या, श्रुतीकांच्या त्यांची आठवणी मोठ्या रम्य होत्या. गायतोंडे २०-२२ वर्षाचे होते तेव्हा त्या १०-१२ वर्षाच्या होत्या, पण गायतोंडे यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या, त्या "गायतोंडे" ग्रंथात माणिक वालावलकर यांनी शब्दांकित केल्याच आहेत, त्या तुम्ही जरूर वाचा. त्याचं एक वाक्य मात्र माझ्या अजून लक्षात राहिलं आहे, त्या म्हणाल्या "बाळ, इतका मोठा चित्रकार होता हे आम्हाला, आम्हालाच काय कुणालाच कळलं नाही …"

No comments:

Post a Comment